वकिलांनी बोलताना भान राखावे   

महिला आयोगाचे बार कौन्सिलला पत्र

पुणे : वैष्णवी हगवणे प्रकरणात सासू लता हगवणे, ननंद करिष्मा हगवणे आणि पती शशांक हगवणे, सुशील आणि राजेंद्र हगवणे या ५ आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली असून, निलेश चव्हाण यालादेखील ताब्यात घेण्यात आले आहे. न्यायालयात आरोपींना आणल्यानंतर त्यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. मात्र, त्यानंतर प्रसारमाध्यमांमध्ये येऊन वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत नको ते चॅट सुरु होते. ते आम्ही पकडले होते. असे म्हणत वकिलांनी वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय व्यक्त केला.
 
हगवणेंंच्या वकिलांकडून झालेल्या या प्रकारानंतर त्यांच्यावर सर्व स्तरावरून टीका होऊ लागली आहे. वैष्णवीच्या वडिलांनी तर रडत रडत मुलीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवू नका, अशी विनंती केली. त्यावरून आता राज्य महिला आयोगाने बार कौन्सिलच्या सचिवांना पत्राद्वारे सूचना केल्या आहेत. वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपींच्या वकिलांचे वर्तन हे अ‍ॅडव्होकेट्स कायदा, १९६१ मधील तरतुदींचे उल्लंघन करणारे आहे. अशा संवेदनशील प्रकरणांमध्ये वकिलांनी माध्यमात बोलताना भान बाळगणे गरजेचे आहे. राज्य महिला आयोगाने सचिव, बार कौन्सिल यांना पत्र लिहून याबाबत गांभीर्याने विचार व्हावा आणि अधिवक्तांसाठी सुस्पष्ट नियमावली ठरवावी अशा सूचना केल्या आहेत.
 
वैष्णवीचा छळ आणि मृत्यू अतिशय संवेदनशील विषय आहे. त्याची न्यायालयीन प्रक्रिया सुरु असताना आरोपींच्या वकिलांनी माध्यमांमध्ये वैष्णवीच्या वैयक्तिक आयुष्याबाबत आरोप केले आहेत. ते आपण न्यायालयात पुराव्यानिशी सादर करावे. माध्यमांसमोर केलेल्या वक्तव्याने तिची प्रतिमा मालिन होत आहे. त्यामुळे वैष्णवीच्या कुटुंबियांना मानसिक, भावनिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. समाज म्हणून वैष्णवीला आणि तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळण्यासाठी आपण त्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. न्याय मिळण्याच्या प्रक्रियेदरम्यान माध्यमातून होणारे असे चारित्र्यहनन पूर्णपणे चुकीचे आहे. वकिलांनी समाजातील एक जबाबदार घटक म्हणून अधिक सजग राहून पीडितेच्या प्रतिष्ठेची व गोपनीयतेची काळजी घेणे अपेक्षित आहे. भविष्यात अशा प्रकारांना आळा बसावा यासाठी आपल्या माध्यमातून याविषयी गांभीर्याने विचार व्हावा आणि वकिलांसाठी सुस्पष्ट व नीतीसंगत नियमावली ठरवावी अशा सूचना आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केल्या आहेत.

Related Articles